शिरूर – वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाच ते पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात रक्कम शाळा सुधार निधीच्या नावाखाली घेतली जात होती मात्र ती रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी खाजगी व्यक्तीच्या नावे जमा करत असल्याचे समोर आले आहे.
वाबळेवाडीची शाळा देशात नावाजलेली आहे या शाळेचे
मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. मात्र या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत होता. स्थानिक विध्यार्थ्यांना प्रवेश टाळला जात होता त्यामुळे जिल्हा परिषदेकडे अनेक पालकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुका गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी आर्थिक व्यवहारात अनियमितता समोर आली असल्याचा अहवाल दिला आहे.
त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील प्रशासकीय अर्थिक आणि अभिलेखांच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाच सदस्यीय समिती जिल्हास्तरीय स्थापन केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत शिक्षण देण्यात येते मात्र या शाळेत उद्योगपतींच्याच पाल्यांना प्रवेश दिला जातो आणि तो प्रवेशही पैसे घेऊन दिला जातो अशा तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या.
प्राथमिक चौकशीत प्रवेशासाठी घेतलेले पैसे खाजगी व्यक्तीच्या नावे बँक खात्यात भरले जात असल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक पालकांकडून घेतलेले पैसे परत केले असल्याचेही मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी सांगितले.
दरम्यान आयुष प्रसाद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत समोर येईल त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे वाबळेवाडीच्या शाळेत शिक्षणासाठी पैशांचा काळाबाजार होत होता की त्यात आणखी काही समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Add Comment