लोणी, धामणी पुणे | आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तब्बल आठ गावं शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक झाली आहेत. या आठ गावांच्या शेतकऱ्यांनी लोणी येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला शेकडो शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान लोणी, धामणी, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर, खडकवाडी, पहाडदरा, रानमळा- वाळूंजनगर या आठ गावातील अनेक शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. भौगोलिक परिस्थिती वेगळी निश्चित आहे मात्र तंत्रज्ञान विकसित आहे त्याचा वापर करा, आणखी किती दिवस आम्ही पाण्यासाठी वणवण करायची? संपूर्ण आंबेगाव पाण्यात डुबलेला असताना आमचीच गावं कोरडी का? आमच्या आईच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवा अशा प्रकारच्या भावना यावेळी चिमुकल्या मुलींनी
देखील व्यक्त केल्या.
दरम्यान शेतकऱ्यांनी पुढच्या आठवड्यात शासन दरबारी निवेदनाद्वारे आपलं म्हणणं मांडणार असल्याचे सांगितले, यावेळी आक्रमक भूमिका घेत एक महिन्याची शासनाला मुदत देऊन जर ठोस उपाययोजना झाल्या नाही तर डिंभे धरणात जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे राजीनामे देऊन पाणी मिळेपर्यंत केवळ सुरू करण्यात आलेल्या पक्षविरहित श्री म्हाळसकांत पाणी कृती समितीसाठी झटणार असल्याचे यावेळी सांगितले.
या बैठकीला शिरूर तालुक्यातील पाबळ ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला तर भविष्यात मिळणाऱ्या पाण्याचा फायदा पाबळला देखील व्हावा यासाठी आमचा देखील या समितीत समावेश करावा अशी पाबळ ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली. यापुढे कोणताही नेते मत मागायला आले तर त्यांना पाण्याबाबत विचारणा करायची त्याचबरोबर वेळप्रसंगी भविष्यातील निवाडणुकांवर देखील बहिष्कार टाकला जाईल असेही बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न पेटला असल्याचे चित्र समोर आले आहे.
Add Comment