महाराष्ट्र राजकीय शिरूर

बावनकुळे म्हणतात पुन्हा सरकार आल्यावर पाच वर्षे वीजबिल घेणार नाही…!

रांजणगाव गणपती, पुणे | माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाचे शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या विनंतीनुसार शिरूर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांशी नुकताच भेटून संवाद साधला यावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या वीजबिल धोरण आणि नियोजनावर बोट ठेवत ऊर्जामंत्री आणि वित्तमंत्री यांच्या वादामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगितले

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वीज स्वस्त असते मात्र महाविकास आघाडी सरकारला याचे नियोजन न करता आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्याचबरोबर ऊर्जामंत्री आणि वित्तमंत्री यांच्यात असलेल्या वादामुळे शेतकरी भरडला जात आहे. आगामी काळात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांचे पाच वर्षे वीजबिल घेणार नसल्याचे देखील सांगितले. चुकीचे नियोजन, थकलेले पैसे, मंत्र्यांमधील वाद यामुळे अघोषित लोडशेडिंग राज्यात राबविण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर सभा न घेता महाराष्ट्रासाठी गेल्या अडीच वर्षात काय केलं आणि यापुढील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करणार आहे यासाठी सभा घ्यावी असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी युवा वाॅरियर्सचे राज्य संयोजक अनुप मोरे, भाजपचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, वैजयंती चव्हाण, राजेंद्र चव्हाण, केशव पाचर्णे, हर्षद ओस्तवाल, प्रकाश पवार, अमृत मारणे उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!