वडगाव रासाई ( ता.शिरूर ) : शिरुरच्या शेतकऱ्यांनो ‘घोडगंगा सहकारी साखर कारखाना मी सुरू करुन दाखवणारच हा माझा तुम्हाला शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे. त्याबद्दल कसलीही शंका मनात ठेवू नका’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केले आहे.
शिरूरसह हवेलीतील नागरिकांनी सभेला मोठया प्रमाणात अभूतपूर्व गर्दी केली होती.त्यामुळे वडगाव- मांडवगण फराटा रस्त्यावर दोन्ही बाजुला पाच किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पवार म्हणाले की, ‘वाढते नागरीकरण व काही इतर घटनांमुळे यशवंत साखर कारखाना बंद पडला. परंतु शिरूरचा घोडगंगा चांगला चालू होता.गळीत हंगाम सुरू करण्यासाठी एनसीडीसीकडून मंजूर झालेले कर्ज या शिंदे सरकारने अडवले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून विचारणा केली, मात्र माझी अडचण आहे समजून घ्या असे ते म्हणाले. म्हणजे यांना कोण ( अजित पवार ) दम देते हे आता माझ्या लक्षात आले आहे. सत्ता ही अडवणूक करण्यासाठी नसते.परंतु घोडगंगा कारखान्याच्या संदर्भात केंद्राच्या एनसीडिसीकडून कर्ज मंजूर होऊनही राजकीय हेतु डोळ्यासमोर ठेऊन राज्य शासनाने घोडगंगाची कर्जाबाबत अडवणूक केली आहे. हल्ली महाराष्ट्रात पैसे असतानाही काही कारखान्यांना पैसे दिले जात नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. सरकार आल्यानंतर शिरूरकरांच्या हक्काचा घोडगंगा कारखाना सुरू केला जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी येथे दिली.
यावेळी पवार यांनी यापूर्वी केलेल्या कर्ज माफीची माहिती देत महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहिरनाम्याचे विश्लेषण केले. ‘चासकमान व घोड धरणाचे पाणी शिरूर तालुक्यात आणल्याने सध्या शिरूर तालुका हा ८५ टक्के बागायती झाला आहे. एमआयडीसी उभी केल्याने डोंगराळ असलेल्या रांजणगाव परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या. पर्यायाने शेतकऱ्यांना दोन अधिकचे पैसे मिळाले तर युवकांना रोजगार मिळाला आहे. सुजाता व अशोक पवार ही वाहून घेणारी माणसं आहेत. त्यांच्यावर अनेक संकटे आलेली असतानाही ते माझ्या सोबत ठामपणे उभे राहिले.त्यामुळे त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे रहा. मोठ्या मताधिक्याने अशोक पवार यांना विधानसभेत पाठवा’ असे आवाहन पवार यांनी केले.
Add Comment