ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

पाचुंदकर म्हणतात रांजणगावकरांना मिळाले साहेब व अजित दादांकडून बक्षिस…!

शिरुर | गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विकास कामांबाबत आश्वासने दिली होती. त्या आश्वासनांची आठवण करून देणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर- आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले होते त्यानंतर तात्काळ वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांसह रांजणगावच्या विविध विकास कामांबाबत अजित पवार यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली.

या बैठकीत रांजणगाव गणपतीसाठी तात्काळ सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या, त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या देखील सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या असल्याची माहिती मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी दिली. या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांसह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अगदी थोडक्या मतांनी विजय झाला. आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील यांना मतांची आघाडी मिळाली असली तरी शिरुरच्या ४२ गावांत मात्र वळसे पाटील यांना पिछाडीचा सामना करावा लागला. दरम्यान मोजक्या काही गावांनी वळसे पाटील यांच्या पारड्यात अधिक मतदान टाकले त्यापैकी एकट्या रांजणगाव गणपती या गावातून २२५ मतांची आघाडी वळसे पाटील यांना मिळाली. त्यामुळेच बक्षीस म्हणून रांजणगाव गणपतीसाठी प्राधान्य देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामे दिली असल्याचे मत मानसिंग पाचुंदकर यांनी व्यक्त केले.


यामध्ये शिरूरच्या ४२ गावांमध्ये असलेल्या ३ जिल्हा परिषद गटात पैकी टाकळी हाजी – मलठण गटातून सर्वाधिक जवळपास अडीच हजार मतांच्या पिछाडीचा सामना दिलीप वळसे पाटील यांना करावा लागला. त्याखालोखाल केंदुर – पाबळ गटात देखील दीड हजारांहून अधिक मतांची आघाडी विरोधी उमेदवार देवदत्त निकम यांनी मिळाली. दरम्यान रांजणगाव – कारेगाव गटात मात्र केवळ दोनशे मतांची पिछाडी वळसे पाटील यांना राहिली.


दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर “सार्वजनिक कार्यक्रमात पराभूत उमेदवार गावच्या पाटलासारखे फिरत आहेत” असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांना उद्देशून केले होते, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक काळात वळसे पाटील यांचे समर्थक म्हणून सर्वाधिक टीकेला सामोरे जावं लागलेले मानसिंग पाचुंदकर मात्र निकालानंतर सार्वजनिक कार्यक्रमांतून गायब झालेले पाहायला मिळाले. मात्र काल झालेल्या मंत्रालयातील बैठकीत त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

माझ्यावर कितीही आरोप झाले किंवा कितीही विशेष पत्रकार परिषद घेतल्या तरी मी माझ्या कर्तव्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. या सर्वांवर माझे कामातूनच उत्तर मिळेल, त्याप्रमाणे आमच्या रांजणगाव गणपती गावाने दिलेल्या प्रेमामुळेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला विकासकांमांचे बक्षीस देऊन पाठीवर थाप टाकली आहे.” – मानसिंग पाचुंदकर पाटील (अध्यक्ष – शिरुर – आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

Featured

error: Copying content is not allowed!!!