क्राईम ताज्या घडामोडी शिरूर

विविध हत्यारांनी दोन गटात तुफान हाणामारी !

शिरूर : बाभुळसर खुर्द येथील वृंदावन लॉन्स शेजारी एका पाण्याच्या पाइप तुटल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून तुंबळ मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोन्ही बाजूच्या व्यक्तींना गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

पहिल्या फिर्यादीनुसार, मनोज कुमार जगरनाथ सिंह (वय 42) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, २९ जून रोजी सकाळी वृंदावन लॉन्स शेजारी त्यांच्या घरासमोर सविता संदीप रामफले, संदीप रामफले, आकाश रामफले, आकाश लहाने ( सर्व रा. कारेगाव ) व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या पत्नी बबीतादेवी सिंह यांना पपईचे झाड तोडल्यानंतर पाण्याच्या पाइपचे नुकसान झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, बांबू व दगडाने जबर मारहाण केली.या मारहाणीत बबीतादेवी यांना गंभीर दुखापत झाली असून, मनोज सिंह व त्यांचा लहान मुलगा आदर्श कुमार यांनाही मारहाण करून दुखापत करण्यात आली. तसेच आरोपींनी जिवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या बाजूने सविता संदीप रामफले (वय 45) यांनी मनोज सिंह आणि बबीतादेवी सिंह यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मनोज व बबीतादेवी सिंह यांनी सविता यांना पाण्याच्या पाइपचा बनाव करून शिवीगाळ करत हाताने, दगडाने, काठीने तसेच कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सविता रामफले यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमार्फत पुढील तपास सुरू आहे. दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!