महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून यंदाच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडणार असून त्यासाठी आयोगाकडून प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल, तर १४ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवता येतील. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०२५ रोजी अधिसूचित विधानसभेची मतदार यादीच या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे मतदार ओळख व नावे तपासण्यासाठी नागरिकांना आयोगाकडून विशेष संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर आयोगाने तयारीला गती दिली आहे. आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडतील. पहिला टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या, त्यानंतरच्या टप्प्यात मुंबई वगळता इतर सर्व महापालिका आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे.
राजकीय पक्षांकडूनही उमेदवार निश्चित करण्याची घाई सुरू झाली आहे. गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले असून स्थानिक निवडणुका ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जात असल्याने या निवडणुकांकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे.
Add Comment