करंदी, पुणे | करंदी ता. शिरुर येथील संकल्प इंजिनिअरिंग ही कंपनी प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून गुजरातमध्ये जाण्याच्या विचारात असताना वन विभागावर दबाव आणून कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर शिक्रापूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर ज्या कारणामुळे कंपनी स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात आहे त्या रस्त्याची अडचण तात्काळ दूर करावी यासाठी करंदी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महसूल आणि वन या विभागाच्या गोंधळात ही कंपनी परराज्यात जाऊ नये यासाठी शासनाने प्रयत्न करावे अन्यथा आम्ही ग्रामस्थ आंदोलन करू अशी भूमिका सरपंच शारदा राजाभाऊ ढोकले यांनी व्यक्त केली आहे.
२००८ मध्ये संकल्प इंजिनिअरिंग ही कंपनी करंदी गावच्या हद्दीत सुरू झाली शेजारीच महसूल विभागाची जागा असल्याने वापरासाठी केवळ १०० मीटर अंतराची रीतसर परवानगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडून घेतली परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही जागा वनविभागाची आहे सांगत वन विभागाने सदर वापरातील जागा वन विभागाच्या परवानगीने वापरावी अन्यथा तात्काळ वापरात असलेला १०० मीटरचा रस्ता बंद करावा असा आदेश कंपनीला दिला. याच अडचणीचा गैरफायदा घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अनेक खंडणी बहद्दरांनी दबाव टाकून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी देखील कंपनीचे अधिकारी कपिल यादव यांनी फिर्याद दाखल करत खंडणीचा शिक्रापूर पोलिस स्टेशन याठिकाणी एक गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर पुन्हा मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने वन विभागावर दबाव आणून संबंधित रस्ता बंद करण्यासाठी उपोषण, आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी हे आंदोलन मागे घेतो मला कंपनीत कंत्राटी काम द्या किंवा एकदम २५ लाख रुपये द्या अन्यथा मी तुमचा रस्ता कायमस्वरूपी वन खात्याकडे दबाव आणून बंद करिन अशी धमकी दिली. दरम्यान दोन दिवसांपासून संकल्प इंजिनिअरिंग कंपनी गुजरातच्या वाटेवर असल्याच्या बातम्या झळकल्याने सरकार खडबडून जागे झाले आणि कंपनीला त्रास देणाऱ्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी करंदी ग्रामस्थांनी देखील कंपनीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. यामध्ये माजी उपसरपंच चेतन दरेकर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किरण उर्फ बंटी ढोकले यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. यापूर्वी देखील कामगार आणि रस्त्याच्या अडचणीबाबत मंत्री वळसे पाटील साहेबांनी ही बाब समजून घेतली आहे, यावर लवकर तोडगा निघावा यासाठी आम्ही ग्रामस्थ सातत्याने प्रयत्नशील आहोत असे मत व्यक्त केले. दरम्यान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ म्हणून जी जी मदत कंपनीला लागेल ती पूर्ण मदत करण्याची तयारी असल्याचे उपसरपंच नितीन ढोकले यांनी सांगितले.
कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायत करंदीला कर मिळत आहे त्याचबरोबर अनेक छोटे – मोठे व्यावसायिक या कंपनीशी संबंधित आहे शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक युवकांना या कंपनीने रोजगार उपलब्ध करून दिला असल्याने करंदी गावच्या विकासात कंपनीचा वाटा आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित होणे आम्हा ग्रामस्थांना परवडणारे नाही त्यामुळे वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याच्या निर्णयावर आम्ही पोहचलो असल्याचे मत कालवा सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ ढोकले यांनी व्यक्त केले.
Add Comment