आंबेगाव – शिरूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व गेल्या सात पंचवार्षिक आमदार दिलीप दत्तात्रय वळसे पाटील करत आहेत. मतदारसंघात असलेला वळसे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क त्यांना नेहमीच सभागृहात पाठवत आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी अनेक दिवस काम केले आहे. मात्र मध्यंतरी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा वळसे पाटील यांनी निर्णय घेतला.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या निष्ठेला प्रामाणिक असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी वळसे पाटील यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात आणखी एक नाव घेतलं जातं ते म्हणजे देवदत्त निकम.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व संचालक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित करण्यात आले आहे. परंतु एकेकाळी वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे देवदत्त निकम आज पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे विरोधात उभे आहेत. वळसे पाटील यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी यावेळी विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, आय-काँग्रेस आणि यात आणखी एक भर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. वळसे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील ४२ आणि आंबेगाव तालुका या ठिकाणच्या गावांमधील विरोधी दोन्ही गटाला स्वतःकडे ठेवले आहे. तसेच इतर पक्षांतील नेत्यांना सांभाळण्यात देखील वळसे पाटील अग्रेसर राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली होती, मात्र आज ही कट्टर शिवसैनिक महाविकास आघाडी सोबत आहे.त्यात महायुतीला ( भाजप आणि शिवसेना ) मुस्लिम मताधिक्याची कमतरता नेहमीच भासत आलेली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे सोबत असणारी दलित व मुस्लिम मते यंदा वळसे पाटील यांना मिळण्याची शक्यता कमी प्रमाणात आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातील ओबीसी समाजाची मते मोठ्या प्रमाणावर डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाल्याने त्यांचा लाखो मतांनी विजय मिळवला. आंबेगाव – शिरूर मतदारसंघात डॉ कोल्हे यांच्यामुळे ओबीसी समाजाची मते विधानसभेला देवदत्त निकम यांना मिळू शकतात. तसेच डॉ. कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकानंतर शिवस्वराज्य यात्रा राज्यभर सुरू आहे. त्यामुळे राज्यातील इतर मतदारसंघ व शिरूर आंबेगाव येथे सुद्धा कोल्हे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा निवडणुकीत दिसून येणार आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत खुद्द सहकार मंत्री वळसे पाटील हजर होते. सभेला संचालक निकम यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी मोठा गदारोळ सभेत पाहायला मिळाला व ज्यावेळी संपूर्ण घटना घडत होती, त्यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दर्जाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे या सगळ्या वेळी प्रत्यक्षदर्शी उपस्थित होते. गावगुंड बोलावून शिवीगाळ करण्यात आली, मंचावर येऊन दिले नाही व मंचावरून थेट खाली ढकलून दिले, शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली असा देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केला आहे. घडलेल्या प्रकारामुळे ४२ गावांसह आंबेगाव तालुक्यात देखील वळसे पाटील यांच्यावर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे यंदाची निवडणूक वळसे पाटील यांना नेहमी प्रमाणे सोपी जाणार नसल्याचे दिसत आहे.
परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याने अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली आहे. आंबेगाव तालुक्यात असणारे शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात नेते वळसे पाटील यांच्यासोबत आहे. तसेच शिरूर तालुक्यातील ४२ गावातील देखील नेते सोबत आहे.
गेल्या पस्तीस वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे वळसे पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी खुद्द शरद पवार देखील मैदानात उतरून रणशिंग फुंकले आहे. तसेच वळसे पाटील यांच्या सोबत नेते जरी असले तरी देखील सर्वसामान्य जनतेची सहानुभूती ही शरद पवार, राहुल गांधी आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या काळात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठीशी उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजा कितनाही बडा क्यू ना हो थोडी गलती हो गई समजो पराभव की और कदम पड रहे है…